विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. १० एप्रील:-कोव्हीड केअर सेंटर मध्ये पर्मनंट/कंत्राटी/रोजंदारी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज’ अंतर्गत 50 लाखाचे विमा कवच शासनामार्फत जाहीर करण्यात आलेले आहे. मात्र, त्यासाठी कर्मचाऱ्यांकडे नियुक्ती पत्र व ओळखपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु, सामान्य रुग्णालय भंडारा येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये रोजंदारी/कंत्राटी तत्वावर कार्यरत कोरोना योद्धांना नियुक्ती पत्र व ओळखपत्र देण्यात आलेले नाही. ही कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर अशी बाब आहे. कर्मचाऱ्यांना काम करत असतांना जिवंतपणीच जर प्रशासनाकडून नियुक्ती पत्र व ओळखपत्र देण्यास टाळटाळ केली जात असेल तर एखाद्या कर्मचाऱ्याचा कोरोना रुग्णांची सेवा करतांना मृत्यू झाल्यास हे प्रशासन खरचं या कर्मचाऱ्यांना ५० लाखाच्या विम्यासाठी मदत करेल काय? असा प्रश्न रिपब्लिकन पँथर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तेजपाल मोरे यांनी प्रशासनाला केला आहे.
कामावर जातांना रस्त्यात अनेकवेळा पोलिसांकडून कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाते मात्र, कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्रच नसल्याने बऱ्याचवेळा त्यांना पोलिसांचा मार सुद्धा खावा लागतो अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पँथर संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव नारनवरे यांनी दिली.
प्रशासनाने येत्या तीन दिवसांच्या आत सर्व कोरोना योद्ध्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र न दिल्यास रिपब्लिकन पँथर संघटना तीव्र स्वरूपाचे पँथर स्टाईल आंदोलन छेडेल अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पँथर संघटनेने जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकारी यांना दिले आहे.