त्रिकुट सरकारने जनतेचा घात केला-अरविंद शिवणकर.
संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.26 जून:-
स्वार्थाच्या राजकारणासाठी ओबीसींच्या आरक्षणावर वार करीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ओबीसींना डावलण्याचा कुटील डाव रचला आहे.दीड वर्षापासून शेतकरी सातशे रुपये बोनस साठी प्रतीक्षा करीत आहे, नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन मदतीच्या घोषणेचा विसर पडला.अर्जुनीमोर तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींचे विजेचे कनेक्शन खंडित करून जनतेला पावसाच्या दिवसात काळोखात ठेवण्याचे महापाप करीत त्रिकुट सरकारने जनतेचा घात केल्याचा आरोप भाजपाचे तालुका अध्यक्ष अरविंद शिवणकर यांनी केला आहे. ते भाजपाच्या वतीने स्थानिक महाराणा प्रताप चौकात शनिवार(26) ला आघाडी सरकारच्या निषेधार्थ चक्काजाम आंदोलनाचे अध्यक्षस्थानावरून उपस्थितांना संबोधित होते.यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य रचना गहाने ,माजी सभापती प्रकाश गहाणे,लायकराम भेंडारकर उमाकांत ढेंगे ,डॉ.गजानन डोंगरवार,महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष किरण कांबळे, नामदेवराव कापगते, रघुनाथ लांजेवार, केवळराम पुस्तोडे, देवेंद्र टेंभरे, प्रमोद पाऊलझगडे,वर्षा घोरमोडे, विजय कापगते, गिरीश बागडे, विनोद नाकाडे,भोजराज लोगडे उपस्थित होते.यावेळी रचना गहाने यांनी, ओबीसी आरक्षण रद्द करून पिढ्या बरबाद केल्या जात आहेत.भूमिपुत्र नाना पटोले विधानसभेत जनगणना करण्याचा विधेयक मंजूर करतात मात्र त्यांचीच सरकार ऐकत नाही.केवळ ओबीसींच्या नावाने देखावा करतात.विधानसभेत धानाच्या पेंडया जाळणारे आज शेकऱ्यासोबत दिसत नाही. पेट्रोल दरवाढ हे राज्याचे पाप आहे.पेट्रोल,डीझेल वर 31 आणि 26 रुपये अधिभार राज्याचा आहे.जनतेची लूट बिघाडी सरकार करीत आहे आणि बोट केंद्राकडे दाखविला जात असल्याचा आरोप केला.गोंदिया भंडारा चे स्वयंभू नेते प्रफुल पटेल धानाचा बोनस आठ दिवसांनी देऊ,चार दिवसांनी बोनस मिळणार असल्याच्या बातम्या प्रकाशित करतात.तारीख पे तारीख होऊनही दीड वर्षांपासून शेतकऱ्यांना बोनस मिळाला नसल्याचा टोला डॉ.डोंगरवार यांनी लावला.
चक्काजाम आंदोलनात महाराणा प्रताप चौकात भाजपाच्या आंदोलकांनी सरकारच्या विरोधात नारेबाजी केली.आंदोलन काळात वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भुते यांच्या नेतृत्वात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.