विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. 28 जुलै:- तालुक्यात येत असलेल्या बेलगाव (मांडवी) येथील शेतकरी काशिराम कुसन केवट वय 70 वर्षे या शेतकऱ्याची स्वतःच्या शेतात असलेल्या कडू लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या बुधवार दि. 28 जुलैला दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांची एकच गर्दी उसळली होती. केवट यांच्याकडे दीड एकर शेती असून नेमकी आत्महत्या कोणत्या कारणाने केली असावी हे अजून पर्यंत कळलेले नाही.
घटनेची माहिती कारधा पोलीस स्टेशनला कळताच क्षणात घटनास्थळी कारधा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वानखडे व पोलीस कर्मचारी यांनी भेट दिली व पंचनामा करून मर्ग दाखल करून मृतदेहाला जिल्हा सामान्य रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. पुढील तपास पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक थेरे करीत आहेत.