महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे पार पडत आहे. राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
राज ठाकरे म्हणाले, “2019ची विधानसभा निवडणूक आठवा.
भाजप आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. निकाल लागल्यानंतर शिवसेनेला खासकरून उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला की मुख्यमंत्रीपदासाठी अडीच अडीच वर्षं ठरली होती. आमच्याशी तर कधी बोलला नाहीत तुम्ही. महाराष्ट्रभरच्या सभांमध्ये बोलला नाहीत. पंतप्रधान मोदी बोलले तेव्हा तुम्ही व्यासपीठावर होतात.
“मुख्यमंत्री फडणवीस होतील असं पंतप्रधान बोलले तेव्हा तुम्ही व्यासपीठावर होतात, तेव्हाही तुम्ही काही बोलला नाहीत. जसा निकाल लागला आणि लक्षात आलं की आपल्यामुळे सरकार अडकतंय, तेव्हा अडीच वर्षांची टूम काढली. एकांतात बोलले होते, मग बाहेर का नाही बोलले? जी गोष्ट सगळ्या लोकांसमोर येणार आहे ती चार भिंतीत का केलीत.
“एक दिवस सकाळी उठून पाहिलं तर जोडा वेगळाच. पळून कोणाबरोबर गेले. लग्न कोणासोबत? तीन नंबरचा पक्ष एक नंबरला आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवतोय. ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं होतं ते शरद पवार आणि काँग्रेससोबत जायला नव्हतं केलं. मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणती शिक्षा देणार?”
- जेलमध्ये अडीच वर्षं असणाऱ्याला पहिला मंत्री करण्यात आलं. मुंबईत स्फोट घडवणाऱ्या नवाब मलिक यांच्याशी संबंध असणारे जेलमध्ये गेले, यांना फरक पडत नाही.
- तीन वर्षांपूर्वी गुढीपाडवा मेळावा झाला होता. त्याच्यानंतर दोन वर्षं मेळावा घेता आला नाही. कोरोना – त्यातून आलेला लॉकडाऊन. तो लॉकडाऊनचा काळ आठवला तरी त्रास होतो. हे शिवतीर्थ सामसूम होतं. आख्खं जगभर सामसूम होती. एक माणूसही फिरताना दिसायचा नाही.
- कोरोनाची भीती होती नाहीतर आमच्या पोलिसांचा दांडिया होता. ते तरी बिचारे काय करणार? त्या काळात पोलिसांनी ज्याप्रकारचं काम केलंय, खासकरून मुंबई महाराष्ट्राच्या पोलिसांना मी धन्यवाद देईन. त्यांनी खाण्यापिण्याची पर्वा केली नाही. आपल्याला कोरोना होईल का याची काळजी न करता 24 तास ते रस्त्यावर होते.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) 16 वा वर्धापन दिन 9 मार्च रोजी पुण्यात पार पडला. यावेळी भाषण करताना राज ठाकरेंनी हे नुसतं ट्रेलर असून पूर्ण पिक्चर गुढीपाडव्याला बघायला मिळेल, असं म्हटलं होतं.
दरम्यान, मनसेच्या या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं मनसेचे कार्यकर्ते शिवाजी पार्कावर जमा झाले.
‘राज तिलक की करो तैय्यारी, आ रहे है भगवा धारी,’ अशा आशयाचे फलक त्यांच्या हातात दिसून आले.