राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी नागभिड
नागभीड: तालुक्यातील सावरगाव येथे पाटिल चौकातील नळ मागील एक महिन्यापासून बरोबर येत नसल्याने पाईपलाईन दुरुस्ती करण्यासाठी, ग्राम पंचायत द्वारा पाटील चौकातील घनश्याम बोरकर यांच्या घराकडे जाणारा सिमेंट रस्ता मागील पंधरा दिवसापासून दोन ठिकाणी फोडून खोदकाम करण्यात आले. थातूर मातूर दुरुस्ती करण्यात आली पण नळाला पाणी आलेच नाही. सदर दुरुस्ती कामाकडे ग्राम पंचायत सदस्य तथा सरपंच यांनी फिरकूनही पाहिले नाही. त्यामुळेच पंधरा दिवस लोटूनही दुरुस्ती तर दूरच राहिले पण खड्डे सुद्धा येत्या पंधरा दिवसापासून बुजविण्यात आले नाहीत व तसेच आहेत. या खड्यात कुणी पडून काही अनुचित घटना घडल्यास सरपंच जबाबदार राहतील काय ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने सर्वत्र पाण्याची टंचाई निर्माण झाली असताना चौकामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. गावात सर्व वॉर्डात पिण्याच्या तसेच वापराच्या पाण्याची भरपूर सोय आहे पण पाटील चौकात एकच बोअर वेल आहे. या ठिकाणी सौर ऊर्जा चलीत मोटार पंप तसेच पाणी टाकी मंजूर झाली होती पण तत्कालीन सरपंच तसेच उपसरपंच यांनी ती आपल्या सोयीच्या वॉर्डात हलवली, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. मात्र सत्ता परिवर्तन होऊन सुद्धा पाटील चौकातील पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. ग्राम पंचायत च्या नियोजन शुन्य वृत्तीमुळे गावात रस्त्यांची तसेच इतरही बरेच समस्या निर्माण झालेल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे सरपंच तसेच सर्व सदस्यांचा बेशरम ची झाडे आणि फुले देऊन जाहीर सत्कार करायला पाहिजे असे काही युवक जाहीर पणे बोलत आहेत. ग्रामपंचायत पदाधिकारी या सत्काराची वाट तर पाहत नसावेत ना असा प्रश्न निर्माण झाला आहे.