विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : बारावी परिक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. त्यात कमी गुण मिळाल्याने एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सेलोटी रोड, लाखनी येथे घडली. मृत विद्यार्थिनीचे नाव मयुरी किशोर वंजारी असे आहे. या विद्यार्थिनीला कला शाखेत ५५ टक्के गुण मिळाल्याने तिने हा टोकाचा निर्णय घेतला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. मयुरी ही लाखनी येथील समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. बुधवारी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल घोषित झाला. त्यात मयूरीला कला शाखेत ५५ टक्के गुण मिळाले. वर्षभर अभ्यास करूनही कमी गुण मिळाल्याने ती निराश झाली. याबाबत तिने कुणालाही काही सांगितले नाही. दरम्यान ४ वाजेच्या सुमारास मयूरीने विष घेतल्याचे घरच्यांच्या लक्षात आले. तिला तात्काळ लाखनी येथील रुग्णालयांत आणि प्रकृती अतिशय गंभीर असल्याने तीला पुढील उपचारासाठी भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. मयूरीचे वडील फर्निचर कामगार म्हणून काम करतात. तिच्या मागे आई, वडील, मोठी बहीण आणि लहान भाऊ असा परिवार आहे. मयूरीने टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपविल्याने हळहळ व्यक्त होत आहे.