मुंबई : महाविकास आघाडीतील पहिल्या फळीतील नेते छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नाना पटोले या महत्त्वाच्या नेत्यांसह सुमारे १५ ते १६ नेत्यांची सुरक्षा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी काढून घेतली. तथापि, सध्या भाजपच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचा आरोप असलेले नेते मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढवण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम आहे. आव्हाड गेल्या सरकारमध्ये मंत्री होते, पण एमसीएच्या निवडणुकीत त्यांना आशिष शेलार यांची साथ मिळाली होती. त्यामुळे त्यांची सुरक्षा कायम ठेवल्याचा कयास लावला जात आहे.
मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ झाल्याने राजकीय भुवया उंचावल्या आहेत. त्यांची सुरक्षा एक्सवरून वाय करण्यात आली आहे. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचेही सुरक्षा काढलेल्या नेत्यांत नाव नाही. मागील दोन ते तीन महिन्यांत शिंदे-फडणवीस सरकार व आघाडीच्या नेत्यांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.
या नेत्यांची सुरक्षा काढली छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, वरुण सरदेसाई, जयंत पाटील, संजय राऊत, नितीन राऊत, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नवाब मलिक, नरहरी झिरवळ, सुनील केदारे आणि डेलकर परिवाराची सुरक्षा काढली.