परमेश्वर सावंत
विभागीय संपादक मराठवाडा
हिंगोली : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या घटनेवरून राजकारण सुरू आहे. या सारखी प्रकरणे महाराष्ट्रातही घडली तेव्हा खासदार संजय राऊत यांनी तोंड का उघडले नाही, असा प्रश्न करीत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला. शनिवारी हिंगोली जिल्हा दौऱ्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केल्यानंतर पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
शनिवारी रात्री सातच्या नंतर त्यांनी डिग्रस कराळे, येहळेगाव सोळंके या गावात मोबाइल बॅटरीच्या प्रकाशात पाहणी केली व बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. पीक नुकसानीसंदर्भात जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. नट-नटय़ा, कंगना-सुशातसिंह या पेक्षाही अधिक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली पाहिजे. कुठल्याही विषयावर राजकारण केले जात आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणातही राजकारण केले जात असून अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रातही घडल्या आहेत. मात्र तेव्हा खासदार राऊत यांनी तोंडही उघडले नाही. राज्यात पिकांचे नुकसान झाल्यानंतर पीक विमा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. राज्य सरकार विमा कंपन्यांसाठी आहे का, असेही ते म्हणाले. दरेकर यांच्या समवेत दौऱ्यात आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. शिवाजीराव जाधव, भाजपाचे पदाधिकारी यांचा समावेश होता.