संतोष जाधव.
तालुका प्रतिनिधी तळा.
तळा/- भाताचे कोठार म्हणून समजल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील शेतकरी परतीच्या पावसाने पुरता हवालदिल झाल्याचे चित्र रायगडात पहावयास मिळत आहे. अनेक तालुक्यातून भात कापणीला सुरुवात झाली असल्याने आणि भात कापणीच्या हंगामात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत असल्याकारणाने शेतातील कापणी ला आलेली उभ पीक जमीनदोस्त होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी कापणी केलेले भात पीक भिजल्या कारणाने हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याचे चित्र रायगडात पहावयास मिळत आहे. त्यामुळे वर्षभर केलेले मेहनत पाण्यात गेल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे निदर्शनास येत आहे. आजच्या घडीला भाताला योग्य हमीभाव मिळत नसल्या कारणाने अनेक शेतकरी भात शेती न करता मुंबई-पुण्यात नोकरी करण्यात धन्यता मानत असल्याचे वास्तव रायगड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. आणि ज्यांनी ज्यांनी पोटापुरती शेती केली अशा शेतकर्यांना मात्र आसमानी संकटाला सामोरे जाण्याची वेळ आज येत आहे. हा परतीचा पाऊस असाच पडत राहिला तर संपूर्ण भात शेती उद्ध्वस्त होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडेल असे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. तरी परतीच्या पावसाने भात शेतीचे नुकसान झाल्यास सरकारने योग्य ती उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी असल्याचे समजते.