हरदोली ग्रा.पं.चा अभिनव उपक्रम
विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि.१७ जानेवारी :- मोहाडी तालुक्यातील ग्रामपंचायत हरदोली येथे नव्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. त्यात करमुक्त असणाऱ्या कुटुंबाला वर्षभर दळणासाठी एकही रुपया खर्च करावा लागणार नाही असा अभिनव प्रयोग ग्रामपंचायत हरदोली झंझाड येथील प्रशासनाने हाती घेतला आहे. असा उपक्रम राबविणारी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे.
कराच्या (ट्रक्स) भांडवलावर ग्राम पंचायत गावाचा विकास करीत असते. ग्रामीण जनता मात्र इमारत कर, पाणीपट्टी कर, दीवाबत्ती कर, स्वच्छता कर, सामन्य आरोग्य आदी कर भरण्यास बेफिकीर झालेले असतात. काम अडल तरच कर भरले जातात ही वास्तविकता आहे. त्यामुळे गावाच्या विकासात खोडा, विघ्न येत असतात.
गावाची सुधारणा, प्रगती व्हावी तसेच नियमित कर भरण्याची सवय गावकऱ्यांना लागावी यासाठी करमुक्त झालेल्या कुटुंबीयांना वर्षभर गहू, तांदूळ, डाळ आदींचे दळण मोफत ग्राम पंचायतीच्या निधीतून करण्यात येणार आहे. तसा ठराव 28 डिसेंबर 2020 ला ग्राम पंचायतने मासिक सभेत एकमताने ठराव पारित केला आहे. त्यात मोफत दळण योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राम पंचायतने अटी/ शर्थी लागू करण्यात आल्या आहेत. करमालकांकडून 14 लक्ष 34 हजार 762 रुपयाची मागणी आहे. 10 लक्ष 71 हजार 420 रुपयाची थकबाकी आहे. ग्राम पंचायतीने आतापर्यंत केवळ 4 लक्ष 83 हजार 951 रुपयाची कर वसुली केली आहे. त्यामुळे कर भरा, दळण मोफत करा ही योजना सुरु केली आहे.
31 मार्च 2021 पर्यंत कर भरणाऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. करदाते 2021-2022 या वित्तीय वर्षात एप्रिल अखेर पर्यंत पूर्ण कर भरतील त्यांना वर्षभर दळण मोफत करून मिळणार आहे. यासाठी करदात्यांना ओळखपत्र दिला जाणार आहे. त्यात कुटुंबातील सदस्यांची नावे राहणार आहेत.
करदात्यांना कर भरण्याची प्रेरणा मिळेल व गावाची प्रगती होण्यास भांडवल हातात येणार आहे. हरदोली ग्रामपंचायत विविध उपक्रमातून गावाला प्रगतीची दिशा देत आहे. त्यामुळेच या गावाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. तर या वर्षीचा स्मार्ट गावचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
हरदोली ग्रामपंचायत अंतर्गत 632 करदाते आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ 140 करदात्यांनी कर भरले आहे. वर्षभर दळण मोफत ही योजना सुरु झाल्यानंतर कर भरण्यास वेग आला आहे.
“गावात थकीत करांचा आकडा वाढत आहे. त्याचा परिणाम गाव विकासावर होत आहे. कर बुडवेगिरीला लगाम लावला जावा. करदात्यांना करप्रणालीमध्ये नियमित करावे. ग्रामपंचायतचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी हा नवीन प्रयोग केला जात आहे.”
सदाशिव ढेंगे,
सरपंच ग्रामपंचायत हरदोली /झंझाड.